झी टीव्हीवरील अभिनव रिअलिटी फॉर्मेट शो ‘छोरियाँ चली गाँव’ हा रिअलिटी फॉर्मेटचा शो या वीकेंडला ग्रँड फिनालेला पोचला. चाहत्यांचा आनंद, ढोल-ताशे आणि गावातल्या सेलिब्रेशनमध्ये लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसानंदानी हिला या शोची विजेती म्हणून घोषित करण्यात आले. तिने अभिमानाने हा प्रतिष्ठित चषक उचलून शोच्या पहिल्या सीझनचा समारोप केला. गाईचे दूध काढण्यापासून, विहिरीतून पाणी काढण्यापर्यंत ते चुलीवर स्वयंपाक करणे आणि गावकऱ्यांसोबत नाती जोडणे या सगळ्यांतून अनिता हसानंदानीचा प्रवास चिकाटी आणि विनम्रता याने भरलेला होता, जो सहभागी स्पर्धकांना, गावकऱ्यांना आणि प्रेक्षकांना भावला.
फिनालेनंतर अनिता हसानंदानीने शगुना बाईच्या नातवंडाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आपल्या यशाबद्दल अनिता हसानंदानी म्हणाली, “जेव्हा मी ‘छोरियाँ चली गाँव’चा हिस्सा बनायचे ठरवले, तेव्हा मला ठाऊक होते की हे मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नेईल, पण मला कल्पनाही नव्हती की या अनुभवातून मी इतकी प्रगल्भ होईन. पहिल्या दिवसापासून मी स्वतःला सांगत होते, की मला हा शो आरव आणि रोहितसाठी जिंकायचा आहे; तेच माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान राहिले आहेत. प्रत्येक वेळी मी संघर्ष केला किंवा मला घराची आठवण आली, तेव्हा मी त्यांचा विचार केला आणि स्वतःला अधिक मेहनत करण्यासाठी प्रवृत्त केले. आज हा चषक धरताना खूप वेगळे वाटत आहे. हे फक्त माझे जिंकणे नाही तर हे आमच्या कुटुंबाचे यश आहे.”

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
